महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, राज्यात गृहमंत्रालय महिला आयोग कार्यरत आहे का? -कविता कळसकर

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 नांदेड शहर प्रतिनिधी/
नांदेड : राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात महिला कधी नव्हे तेवढ्या असुरक्षित झाल्या आहेत. गृहमंत्री आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी याबाबत बोलावे असे आवाहन नांदेड जिल्हा काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा कविता कळसकर यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा कविताताई कळस्कर यांनी महिलावरील अत्याचारासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून म्हटले आहे की महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या महिलांना सन्मान मिळवून देणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात महिलावरील अत्याचारात अलीकडील काळात खूप मोठी वाढ झालेली आहे. पुण्याच्या जवळच राजगडाच्या पायथ्याशी झालेली दर्शना पवार या उदयोन्मुख अधिकारी युवतीची हत्या, मुंबईतील कुकर कांड किंवा महिला आयोगाचे अध्यक्ष राहत असलेल्या पुणे शहरातील एमपीएससी करणाऱ्या युवतीवरील कोयत्याचा हल्ला किंवा कालच उस्माननगर येथील विष पाजून हत्या या सर्व बाबी पाहिल्या तर महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्था नसल्याचे जाणवते. विशेषता महिलांच्या सुरक्षेबाबत कुठलीच उपाय योजना गृहमंत्रालय व शासनाकडून करण्यात आलेली नाही. दिवसा गणित वेगवेगळ्या भागात महिलांवर अत्याचार होतानाच्या बातम्या पाहायला मिळतात. या बाबीचा महिलांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. आमचे राज्य सरकार, गृहमंत्रालय आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांना आवाहन आहे लवकरात लवकर महिलांच्या सुरक्षेबाबत कडक पावले उचलून आया बहिणींना संरक्षण द्यावे. अन्यथा काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आवाहन कविताताई कळस्कर यांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!