बँकेत मोठ्या पदावर कार्यरत असल्याने तिला चांगले स्थळ येऊ लागले.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड : आपल्या आयुष्याचा जोडीदार हा सरकारी नोकरीवाला किंवा इंजिनियर, डॉक्टर हवा अशी मुलींची इच्छा असते. शेतकरी मुलगा म्हटलं तर मुली नकार देत असतात. मात्र नांदेडच्या एका उच्चशिक्षीत आणि उच्च पदावर असलेल्या एका मुलीने याला अपवाद ठरवत आपल्या आयुष्याचा जोडीदार शेतकरी मुलगा निवडला आहे.
एवढचं काय तर तिने चक्क आपल्या पालकांना शेतकरी नवरा पाहिजे यासाठी हट्ट देखील केला. मुलीचा ही हट्ट आई वडिलांनी पुरवला असून आज रविवारी तिचा शेतकरी मुलासोबत विवाह संपन्न झाला. यावेळी वऱ्हाडी मंडळींना रोपटे देऊन पर्यावरणाचा संदेश दिला.
वैष्णवी कदम ही नांदेड च्या हदगाव तालुक्यातील साप्ती या छोट्याश्या गावातील रहिवासी आहे. तिने एमएस ईलेक्ट्राॅनिक्स आणि एमएसडब्लूची पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण करत असताना तिने हदगाव तालुक्यातील गोदावरी अर्बन बँकेत नोकरी करण्यास सुरुवात केली. सध्या ती बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत आहे. वैष्णवीचे वडील हे शेतकरी आहेत. आपले वडील शेतकरी असल्याने तिला लहानपणापासूनच शेतीची आवड होती.
मुलगी उच्च शिक्षित आणि बँकेत मोठ्या पदावर कार्यरत असल्याने तिला चांगले स्थळ येऊ लागले. मोठ्या शहरातून डॉक्टर, इंजिनियर आणि शासकीय कार्यालयात चांगल्या पदावरील मुलांनी लग्नासाठी मागणी केली. मात्र सर्वस्थळ नाकारत वैष्णवीने शेतकरी मुलासोबत लग्न करण्याचे ठरवले. आपल्या आई वडिलांकडे तिने शेतकरी मुलासोबत लग्न करण्याचा हट्ट देखील केला. आपल्या मुलीचा हट्ट पुरवत आई- वडिलांनी शेतकरी वर शोधला. रविवारी मोठ्या थाटात वैष्णवीचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील नितीन पाटील सोबत संपन्न झाला आहे. नितीन पाटील याच्याकडे १५ एकर शेती आहे. वैष्णवीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होतं आहे. दरम्यान वैष्णवी कदमने उचललेले पाऊल हे कौतुकास्पद आहे. यामुळे आता शेतकरी मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार आहे.