नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे दिनांक १०.०२.२४ रोज शनिवारी सकाळी ठीक ११:०० वा. महाविद्यालयाच्या आय.सी.टी. हॉलमध्ये पालक विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. शिवराज देशमुख सर हे होते तर विचारपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक तथा सामाजिक विचारवंत डॉ.हनुमंत भोपाळे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. बी एल घायाळ, हिंदी विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मण काळे, पालक नामदेव पदमने, मोहम्मद नुरुद्दीन, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. एफ.एम. सौदागर हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. सौदागर म्हणाले की आजच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर महत्त्वाच्या कामासाठीच करावा व अतिवापर टाळावा.पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे नाते हे आजच्या घडीला लोप पावत चालले आहेत.पालकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाकडे अधिक लक्ष द्यावे असे प्रास्ताविक करताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा.डॉ. हनुमंत भोपाळे म्हणाले की आजच्या युगात ज्या ज्या राष्ट्रांनी शिक्षणाला महत्त्व दिले त्यां राष्ट्राचा अधिक विकास झाला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला अधिक महत्त्व दिले म्हणून सर्व जगभर डॉ. आंबेडकर यांची ओळख सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून केली जाते.
तसेच श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण यांनी त्या काळात अथांग परिश्रम घेऊन शिक्षणाचे महत्त्व ओळखले व त्या काळी हैदराबाद येथे जाऊन उच्च शिक्षण घेतले. व तमाम बहुजनाच्या विद्यार्थ्यांसाठी श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. म्हणून अभिमानाने सांगता येईल की
आजतगायत या संस्थेचे हजारो विद्यार्थी केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही आपलं नाव वेगवेगळ्या क्षेत्रात उज्वल करत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना केले.
पालक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव पदमने यांनी विविध अनेक सामाजिक व शैक्षणिक प्रश्नावर आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ.शिवराज देशमुख सर बोलताना म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास केला पाहिजे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये योग्य समन्वय असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा अडथळा व कारणे न सांगता सर्व गोष्टीवर मात करून अधिक अधिक चांगले शिक्षण घेतले पाहिजे.तरच आपली प्रगती होईल.आजच्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर अधिक असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये, कुटुंबामध्ये, समन्वयचा अभाव जास्त दिसून येतो.ह्या सर्व गोष्टीला तिलांजली देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे वळले पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात डॉ.शिवराज देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शंकर विभुते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शशिकांत हटकर यांनी मानले.
यावेळी पालक म्हणून शेख युसुफ,शंकर गायकवाड, काशिनाथ गरड,नामदेव पदमने मोहम्मद नुरुद्दीन,यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी,बहुसंख्य पालक व असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.