नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचार दौऱ्यासाठी उधमपूरमध्ये होते. येथे त्यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा प्रचार केला. दौऱ्यामध्ये त्यांनी एका जाहीर सभेला संबोधित केलं.
यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरला लवकरच संपूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, असं सांगत येथे निवडणुका होतील अशीही घोषणा केली. धमपूर येथे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मी उधमपूर येथे मागच्या अनेक दशकांपासून येत आहे. जम्मू-काश्मीरच्या धर्तीवर माझं येणं-जाणं आजचं नाही. मागच्या पाच दशकांपासून मी येथे येतोय. मला आठवतंय १९९२च्या एकता यात्रेदरम्यान आपण माझं भव्य स्वागत करुन यथोचित सन्मान केला होता. लाल चौकात तिरंगा ध्वज फडकावण्याचं माझं स्वप्न होतं. तेव्हा मला इथल्या माता-भगिनींनी खूप आशीर्वाद दिले होते.
ते पुढे म्हणाले की, वर्ष २०१४ मध्ये मी माता वैष्णौ देवीचं दर्शन करुन आलो होतो. त्यावेळी याच मैदानावर मी तुम्हाला गॅरंटी दिली होती की, मागच्या अनेक पिढ्यांनी जे सहन केलंय, त्यातून मुक्ती मिळवून देईल. आज आपल्या आशीर्वादाने मी ती गॅरंटी पूर्ण करुन दाखवली आहे.
”आता तो दिवस दूर नाही जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील.. प्रत्येकजण आपल्या मागण्यांसाठी आमदार-मंत्र्याकडे जावू शकेल. मी तुमच्यासाठी खूप मोठं स्वप्न बघितलं आहे. येथे लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील, शिवाय जम्मू काश्मीरला राज्याच्या दर्जा दिला जाईल.” असं मोदी म्हणाले.