नायगाव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची नियमित वेळ सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० अशी होती. परंतु गेल्या वर्षीपासून ती वेळ सकाळी ८:४५ ते सायंकाळी ४:०० अशी करण्यात आली आहे.
सदर वेळ विद्यार्थ्यांकरिता अयोग्य असून सदर वेळ बदलावी याकरिता शिक्षक कर्मचारी व विविध संघटनांनी वेळोवेळी निवेदने दिली व मोठे आंदोलनही उभारले होते. परंतु आदिवासी विकास विभागाने या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून पूर्वीप्रमाणे म्हणजे सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० व्हावी याकरिता आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी वृंदांनी पालघर लोकसभा चे नवनिर्वाचित खासदार डॉ. हेमंत सवरा यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन डॉ. हेमंत सवरा यांनी दिले.
यावेळी राजेश पाटील, गणेश गोंटलेवार, शरद गायकवाड, अमोल गायकवाड, तुषार पालवे, प्रशांत गोखले, योगेश भामरे, महेंद्र मस्के, आशा बामणे, गीतांजली पाटील आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.