श्री काशी व श्रीशैल जगद्गुरु यांचे गौरवोद्गार
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
शिवनाम सप्ताहाची सांगता;भक्तांची अलोट गर्दी
नांदेड, दि.25 (प्रतिनिधी)- माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे एक सुसंस्कारित व्यक्तीमत्त्व आहे. त्यांच्या आचरणातून धर्म, धर्मगुरु व समाजाप्रती
आपुलकीची भावना पदोपदी जाणवते. समाजाचे काम अधिक ताकदीने करण्यासाठी त्यांना गतवैभव प्राप्त व्हावे अशीच आमची भावनेने असून त्यांच्यामध्ये समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्याची क्षमता असल्याचे आशीर्वादरुपी गौरवोद्गार श्री काशीपिठाचे जगद्गुरु व श्रीशैल पीठाचे जगद्गुरु यांनी आज येथे काढले.
वीरशैव लिंगायत धर्मातील शिवाचार्यांच्यावतीने नांदेडजवळील पिंपळगाव येथील विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालयात अधिक श्रावण मासनिमित्त आयोजित केलेल्या अखंड शिवनाम सप्ताहाच्या सांगता समारंभ प्रसंगी दोन्ही गुरुवर्य शुभाशिर्वाद देताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिध्दलींग शिवाचार्य महाराज साखरखेडकर होते. व्यासपिठावर महाराष्ट्र, तेलंगणा व कर्नाटकातील विविध मठांचे शिवाचार्य, संत बाबा बलविंदरसिंग यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर,काँग्रेसच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डॉ.मीनलताई खतगांवकर, माजी महापौर शैलाजा स्वामी, श्रीमती वंदनाताई मोरगे,माजी सभापती किशोर स्वामी, शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, माजी सभापती संजय बेळगे, माजी सभापती बालाजी पांडागळे, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, राजु शेटे,नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,गोविंद गोदरे, दीपक पावडे, हिंगोलीची माजी नगराध्यक्ष सुधीरअप्पा सराफ, विजय होकर्णे, पंडितराव लंगडे, डॉ.विशाल ल़ंगडे, नागनाथ स्वामी, गजानन स्वामी, शिवकुमार हिरेमठ, मारोती किरकन, मारोती जाधव, शिवलिंग स्वामी, अमोल डोंगरे, प्रवीण देशमुख,, मेघा स्वामी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीशैल जगद्गुरु म्हणाले की, ईश्वर नामाचा महिमा अगाध आहे. रामायणामध्ये हनुमान व हनुमान भक्तांनी दगडांवर श्रीरामाचे नाव लिहून समुद्रात टाकून त्यातून सेतू बनविला. पण त्याचवेळी हाच प्रयोग जेव्हा श्रीप्रभू रामचंद्रांनी केला त्यावेळेस मात्र त्यांनी समुद्रात टाकलेला दगड तरंगला नाही. यावरुन देवाच्या अधिक समिप जाण्यासाठी त्यांच्या नामस्मरणाची गरज असल्याचे त्यांनी त्यांच्या आशीवर्चनातून सांगितले. यावेळी श्री काशी जगद्गुरु यांनी त्यांच्या आशीर्वचनातून समाजाच्या जडणघडणीमध्ये धार्मिक कार्याना मोठे महत्त्व असल्याचे सांगतानाच या पवित्र महिन्यात झालेल्या शिवनाम सप्ताहामुळे नांदेड परिसर पुनित झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
ज्यांच्या पुढाकारातून हा अखंड शिवनाम सप्ताह संपन्न झाला. बिचकुंदेकर महाराज यावेळी म्हणाले की, डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेतून घेण्यात आलेल्या या सोहळ्यात ईश्वरनामाचा मोठा जप्त झाला असून स्वर्गातून अहमदपूरकर महाराज हे सर्व पाहात आहेत. त्यांनी जरी शरीराचा त्याग केला असला तरी त्यांचे मन मात्र तुम्हा सर्व भक्तांमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दोन्ही जगद्गुरु व सर्व गुरुवर्यांचे महावस्त्र देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांचे समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांनी केले. या धार्मिक सोहळ्यास मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची उपस्थिती होती.
चौकट
सामाजिक सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न-चव्हाण
मणिपूर येथील महिलांवरील अत्याचार असेल किंवा देशाच्या विविध भागात सतत होणाऱ्या दंगली व त्यातून निर्माण झालेली अराजकता अत्यंत गंभीर आहे. प्रत्येक जण मोठ्या मेहनतीने घरसंसार उभे करतो. पण आपले घर, कुटूंब सुरक्षित राहणार नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. देशात सध्या जे काही घडत आहे ते अतिशय चिंताजनक असून सामाजिक सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यावेळी केले.
नांदेड येथे अधिक श्रावण मास निमित्त संपन्न झालेल्या अखंड शिवनाम सप्ताहातून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठा पुण्यसंचय झाला आहे. देशभरातील सर्व शिवाचार्य व जगद्गुरु यांचे एकाच व्यासपीठावर दर्शन घेण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याचे सांगतानाच ईश्वराचे नामस्मरण व संत महंतांच्या आशीर्वादामुळे मी कधीही सन्मार्ग चुकलो नाही. आज या व्यासपीठावर मी राज्याचा माजी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर या सर्व धर्मगुरुंचा निस्सीम भक्त म्हणून आलो आहे. केवळ कार्यक्रमास उपस्थित राहून पुण्य मिळविता येत नाही तर त्यासाठी मनी भाव असणे आवश्यक असते. संतांनी सांगितलेले विचार प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज आहे. अहमदपूरकर महाराज यांनी आपणास नेहमीच आशीर्वाद दिला असून त्यांची समाजामध्ये मोठी उणिव भासत असल्याचे जाणवते.
वीरशैव लिंगायत समाज म्हणून नव्हे तर प्रत्येक समाजाचे प्रश्न सोडविण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. या समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळवून देण्यासाठी श्री केदार जगद्गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केले. त्यास 2013 मध्ये आपणास यश मिळाल्याचे समाधान आहे. परंतु या समाजातील लिंगडेर, लिंगायत, वीरशैव लिंगायत वाणी या पोटजातींना आरक्षण मिळत नसल्याचे सांगण्यात आले. या विषयावरसुध्दा आपण मनातून लक्ष घालू. या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.