विकसित भारत तेव्हाच शक्य; जेव्हा महाराष्ट्राचा विकास होईल’
अभिषेक बकेवाड | नांदेड – काँग्रेसने फसवणुकीचे आपले सर्व रेकॉर्ड तोडले आहे. काँग्रेसचे लोक संविधानाच्या नावावर स्वतःचे लाल पुस्तक वाटत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गेल्या १० वर्षांपासून देशात एक ओबीसी पंतप्रधान काम करत आहे. जो सर्वांना सोबत घेऊन चालला आहे, हे काँग्रेसला सहन होत नाही. त्यामुळे काँग्रेस ओबीसींची ओळख नष्ट करून त्यांना वेगवेगळ्या जातींमध्ये विभागण्याचा खेळ खेळत आहे, अशा शब्दांत पीएम मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
हा प्रयत्न नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत सर्वांनीच केला. आता तेच काम, तीच चालाखी करुन काँग्रेसचे शहजादे देशातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. म्हणूनच मी देशवासियांना सांगतो की, समाज तोडण्याऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहा. आम्ही एकजूट राहिलो तरच सुरक्षित राहू, अशी टीका त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
‘विकसित भारत तेव्हाच शक्य; जेव्हा महाराष्ट्राचा विकास होईल’
विकसित भारत तेव्हाच शक्य आहे; जेव्हा महाराष्ट्राचा विकास होईल. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब समृद्ध होईल. केंद्रातील आणि राज्यातील महायुतीचे सरकार तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करा, असे आवाहन पीएम मोदी यांनी नांदेड येथील सभेत केले.