राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार
मुंबई -मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. सध्याचं राज्यातील वातावरण पाहाता या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जाणार? या बैठकीला कोण कोण मंत्री उपस्थित असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे, याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या वर प्रतिक्रिया देताना बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.