नवी दिल्ली -राज्यात विधानसभेची निवडणूक होताच वेध लागतात ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे. गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यामुळे तिथे प्रशासकीय राज आहे.
यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत (ABGP) चे प्रतिनिधीत्व त्यांचे पुणे विभाग प्रमुख विजय सागर यांनी अधिवक्ता सत्या मुळ्ये यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल करून राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील दीर्घकाळ प्रलंबित महापालिका निवडणुका तातडीने घेण्याचे निर्देश मागितले आहेत.
यावर २२ जानेवारी रोजी सर्वाच्च न्यायालय निकाल देणार असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याची माहिती देखील मिळणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत. 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत. यामुळे नागरिकांच्या अनेक नागरी समस्येबाबत तक्रारी आहेत. सुरुवातीला कोरोना रोगाचा प्रादुर्भाव, प्रभाग रचना आणि नंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबविण्यात आल्याचे कारण देण्यात आले होते