नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा दारूण पराभव झाला. मुख्यमंत्री आतिशी, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला. भाजपने एकहाती सत्ता मिळवत २७ वर्षांचा दुष्काळ संपवला.
आम आदमी पार्टीच्या पराभवानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केलीय. अण्णा हजारे म्हणाले की, मी नेहमीत सांगितलं की, उमेदवाराचं वागणं, विचार शुद्ध असायला हवं. त्याग असायला हवा, कोणताही डाग नसावा. हे गुण तुम्हाला मतदारांचा विश्वास मिळवण्यासाठी उपयोगी पडतात.
दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनात अण्णा हजारे यांच्यासोबत अरविंद केजरीवाल होते. त्यानंतरच अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीची स्थापना करत सक्रीय राजकारणात उतरले. अण्णा हजारे म्हणाले की, लोकांनी नव्या पक्षावर विश्वास ठेवला होता पण दारुची दुकाने वाढवल्यानं केजरीवालांची प्रतिमा मलीन व्हायला लागली. निस्वार्थ भावनेनं जनतेची सेवा करणं हीच देवाची पूजा असते. मला हे कळलं नाही की कशामुळे ते चुकीच्या मार्गावर गेले.
स्वार्थ आला की डाऊन होतो. पक्ष सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी नाहीय. देशाची , समाजाची सेवा करण्यासाठी पक्ष आहे. आपल्या घटनेनं पक्ष आणि पार्टी असं नाव कुठेच ठेवलेलं नाही. फक्त व्यक्ती आहे. त्याच्या कार्यप्रणालीवर पक्ष आणि पार्ट्या डोईजड होत गेले असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.