नांदेड प्रतिनिधी/ हरजिंदर सिंघ संधू
नांदेड – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला गतीमान करणारा आहे. देशातील सर्वच घटकांच्या विकासाला गती व गुंतवणुकीला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक उत्तम निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे रोजगार निर्मिती होईल, क्रयशक्ती वाढेल आणि देशाच्या अर्थकारणाला अधिक वेग मिळेल.
या अर्थसंकल्पात ‘ज्ञान’ अर्थात गरीब, युवा, अन्नदाता आणि नारीशक्तीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. देशातील सर्वात मोठा आर्थिक उत्पन्न गट असलेल्या मध्यमवर्गावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. १२ लाख रुपयांपर्यंत करमुक्त उत्पन्न, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख रुपये, एमएमएमईसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर ५ कोटी रुपयांवरून १० कोटी, हे तीन निर्णय मध्यमवर्ग, शेतकरी आणि उद्योजकांना बळ देणारे आहेत.
कापूस, तूर व मसूरचे उत्पादन वाढवणे आणि डाळींच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा स्वागतार्ह आहे. जीवनरक्षक व कँसरवरील औषधे स्वस्त केल्याने उपचारावरील खर्च कमी होईल. लिथियम आयन बॅटरी स्वस्त करण्याच्या प्रस्तावातून इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील. ‘इंडियन पोस्ट’ला एका मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक संस्थेत रुपांतरीत करण्याच्या निर्णयाने देशातील या जुन्या व महत्वपूर्ण यंत्रणेला नवसंजीवनी मिळेल.