गोरगरिबांसाठीच जप्त वाळूचा लिलाव; हराशी घेणाऱ्यांनी गरिबांना स्वस्त दरात वाळू देण्याचे तहसीलदारांचे निर्देश
माहूर तालुका प्रतिनिधी/ बजरंगसिंह हजारी
माहूर – नुकतेच रुजू झालेले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी ९ महिन्यांमध्ये धडाकेबाज कारवाया करत वाळू चोरी करणारी तब्बल 33 वाहने जप्त करून त्या माध्यमातून लाखोंचा दंड वसूल करत शासनाच्या तिजोरीत जमा केला असून ,यामुळे वाळू चोरी शून्यावर आली आहे. वाळू तस्करांनी जमा केलेल्या नदी काठावरील जप्त वाळू साठ्यांचा लिलाव करून वाळू विक्री चोले पेंड आणि पडसा या ठिकाणी दिनांक १३ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी स्वस्त दराने होत असलेल्या या वाळू विक्रीचा लाभ घ्यावा! असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.
शासनाकडून वाळू घाटांच्या हराशींचे कार्य विचाराधीन असून यामुळे मात्र घरकुल धारक व गोरगरिबांना स्वस्त वाळू मिळणे दुरापास्त झाले होते. त्यामुळे तहसीलदार किशोर यादव यांनी वाळू तस्करांनी नदीपत्रावर वाळू चोरीच्या उद्देशाने जमा केलेल्या वाळूची जप्ती करून या जप्त वाळूचा गोरगरिबांना फायदा व्हावा यासाठी सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्याकडे प्रस्ताव पाठवले. या दरम्यान पोटदुख्यांकडून चुकीच्या वावड्या उठवल्या जात होत्या. त्यामुळे गोरगरीब तथा घरकुलधारकांचा विचार करून सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी तात्काळ लिलाव जाहीर करून जप्ती घेणाऱ्यांना वाळूचे लिलावात बोली मंजूर करून त्यांना स्वस्त दरात गोरगरिबांना वाळू विक्री करण्याचे आदेश दिल्याने चोले पेंड आणि पडसा या ठिकाणी गुरुवार १३ फेब्रुवारी पासून स्वस्तात वाळू विक्री सुरू करण्यात आली आहे.
नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या कणखर भूमिकेमुळे तहसीलदार किशोर यादव तथा महाकाल तथा उर्फ नायब तहसीलदार कैलास जेठे, नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांनी वाळू चोरांची वाहने पकडण्याचा सपाटा लावल्याने वाळू तस्करी 100% बंद झाली असून, यामुळे मात्र नागरिकांना वाळू मिळणे दुरापास्त झाले होते. त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी दि 13 रोजी पासून तालुक्यातील मौजे लिंबायत शिवारात जप्त वाळूचा लिलाव विनायक मुसळे यांना दिला तर पडसा येथील लिलाव इमरान नवाब शेख यांना दिला आहे. त्यामुळे वाळू साठे हराशीमुळे नागरिकांना आता आणखी स्वस्त वाळू मिळणार असून,नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधून वाळू उपलब्ध करून घ्यावी !असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.
दिनांक 13 रोजी वाळू साठ्यांचा लीलाव होऊन विक्री सुरू झाल्याने तहसीलदार किशोर यादव यांनी तलाठी गावंडे, कोतवाल चालक शेडमाके यांचेसह विक्रीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पावत्या चेक करत मजूराद्वारेच वाहनात वाळू भरत असल्याची खात्री केल्याने नागरिकांनी तहसीलदारांच्या या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे.