माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची शासनाकडे मागणी!
माहूर तालुका प्रतिनिधी/ बजरंगसिंह हजारी
माहूर – जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात देशाच्या विविध भागातील निर्दोष अशा २८ पर्यटकांना ठार केले गेले. मृतांमध्ये ६ महाराष्ट्रीयन नागरिकांचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून अत्यंत निंदनीय आणि संतापजनक अशा या दहशतवादी हल्ल्यानंतर जनसामान्यात दहशतवाद्यांच्या विरोधात कमालीचा रोष निर्माण झाला आहे. शासनान निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करावी अशी मागणी माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केली आहे.
“जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप आणि निःशस्त्र पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ला केवळ मानवताविरोधी नाही, तर आपल्या देशाच्या एकतेला, अखंडतेला आणि शांततेला दिलेली थेट धमकी आहे!” तिव्र शब्दात नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी पहलगाम घटनेचा निषेध करत या अमानुष हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व पर्यटकांच्या ज्यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे त्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी आपल्या हळव्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. मृतकांच्या परिवाराच्या दुःखात संपूर्ण माहूर शहरासह मी सहभागी असल्याचे सांगून त्यांनी दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या या सर्व दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मास्टर माइंडला शोधून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करा ?अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.