माहूर तालुका प्रतिनीधी/ बजरंगसिंह हजारी
माहूर: तालुक्यातील वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत चुकीच्या पद्धतीने लोकसंख्येची माहिती सादर करीत शासनाची दिशाभूल करुन कामे मंजूर करण्यात आली ती कामे रद्द करुन संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आ.भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.त्यांच्या मागणीची दखल घेऊन तालुक्यातील वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत मंजुरी देण्यात आलेल्या सर्वच कामांना स्थगिती देण्यात आली असल्याने पुढील आदेश प्राप्त होईर्पर्यंत कुठलीही कारवाई करु नये असे आदेश ईतर मागास बहुजन कल्याण नांदेडचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी दिनांक 25एप्रिल 2025रोजी गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांना लेखी सूचना पत्र देऊन कळविले आहे.
सदर योजनेअंतर्गत माझ्या मतदारसंघात चुकीच्या व खोट्या माहिती आधारे शासनाची दिशाभूल करुन चुकीच्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून घेतल्याचा गंभीर आरोप आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अतुल सावे यांना दिलेल्या निवेदनातुन केला होता.
आमदार केराम यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की तालुक्यातील बोरवाडी गावात संबंधितांनी तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत विकास कामांना मंजुरी मिळविण्यासाठी तिथे बंजारा, आदिवासी,ईतर समाज वास्तव्यास असताना खोटी व लोकसंख्येची चुकीची आकडेवारी दर्शवुन सन 2024-25या आर्थिक वर्षासाठी विविध विकास कामांसाठी एक कोटी 85 लाख रुपयांचा मोठा निधी परस्पर मंजूर करुन घेतला असल्याने सदर योजनेची कामे तात्काळ स्थगीत करुन सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. बोरवाडी गावात लोकसंखेच्या निकषांना तिलांजली देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजुर केल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.