बनावट दस्तावेजांच्या आधारे शेतकरी अनुदान व पीकविमा योजनांचा गैरवापर

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

जालना जिल्हा प्रतिनिधी/

जालना -शासकीय अनुदान घोटाळा महाराष्ट्रात गाजत असताना आता पुन्हा एक घोटाळा उघडकीस आला असून यात शासनाला तब्बल १ कोटींचा चुना लावण्यात आला आहे.

  भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड गावात बनावट सातबारा आणि खोटे पीक पेरा दाखवत शासनाच्या अनुदान व पीकविमा योजनांमध्ये तब्बल १ कोटी २ लाख ३९ हजार रुपयांचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून कृषी व पणन विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे.

या प्रकरणात आरोपींनी खोटे सातबारा तयार करून त्यावर २०९३ क्विंटल जास्तीची सोयाबीन पीक पेरा नोंदवली, त्याआधारे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान व पीकविमा मिळवला आणि त्याचाच वापर करून बनावट उत्पादन विक्रीचे दस्तावेज सादर केले. या बनावट नोंदींच्या आधारे सोयाबीनची विक्री दाखवून राज्य शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी जालना जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांनी पारध पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्या आधारे पुढील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1. भागवत सुदाम दौड 2. सुनिल शिवाजी शिंदे 3. अनिल शिवाजी घुले 4. सुरेश कैलास सोनवणे 5. रमेश ठकुबा गायकवाड 6. कृष्णा साईनाथ गायकवाड 7. गोपीनाथ कौतीक दौड 8. सचिन भगवान दौड 9. कृष्णा सुभाष आन्वेकर (सर्व रा. जानेफळ गायकवाड, ता. भोकरदन, जि. जालना) 10. पवन वाघ (पूर्ण नाव अज्ञात),रा. वरुड बु.,ता. भोकरदन, जि. जालना

    सदर प्रकरणाचा तपास सपोनि एस.डी.माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संबंधित संस्थेचे आर्थिक व्यवहार,शासनाच्या अनुदानाची रक्कम आणि शेतमाल विक्रीच्या दाखल्यांची चौकशी अधिक खोलवर सुरू आहे. या प्रकारामुळे शासन यंत्रणा सतर्क झाली असून,इतर ठिकाणीही अशा प्रकारच्या बनावट नोंदींचा तपास लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!