१६ सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुद्दत उपोषण आणि धरणे आंदोलन-कॉ.गंगाधर गायकवाड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.2.सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन प्रणित वन कामगार संघटनेने दि.१६ सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर बेमुद्दत धरणे आणि उपोषण करण्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि वन मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या मार्फत निवेदनाद्वारे दि.२९ ऑगस्ट रोजी लेखी स्वरूपात दिला आहे.
बोगस कामे दाखवून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करणारा नांदेड वन विभाग वरिष्ठांच्या आशिर्वादामुळे कायम सुरक्षित राहिला आहे.
वन मजुराप्रती खूपच उदासीन असलेल्या शासन आणि प्रशासनाच्या हयगयी मुळे दि.२८ ऑगस्ट रोजी किनवट तालुक्यातील लोणी येथील वनमजूर असलेल्या कौशाबाई प्रल्हाद परचाके या आदिवासी प्रवर्गातील आंदोलन करणाऱ्या महिलेचा वन अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाला आहे.
दि.२८ ऑगस्ट रोजी सीटू चे नांदेड महापलिके मध्ये अतिवृष्टीमध्ये झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून सत्याग्रह आंदोलन सुरु होते. आणि कौशाबाई परचाके यांचा मृत्यू झाल्याचे कळताच हजारो आंदोलकांनी महापालिके मध्ये दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून शहीद कौशाबाई परचाके यांना आदरांजली वाहिली आणि शासनाचा निषेध करून दुःख व्यक्त केले होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोतस्वी वर्षामध्ये आशा घटना घडणे हे खूपच वेदनादाई आणि धोक्याचा इशारा देणाऱ्या घटना आहेत.
नांदेडचे उप वनसंनरक्षक श्री केशव वाबळे यांनी लक्ष देऊन योग्य कारवाई केली असती तर एका आदिवासी आंदोलक महिलेचा जीव गेला नसता अशी चर्चा सर्वत्र राज्यभर होत असून हळहळ व्यक्त केली जात आहे. रोहयो मधील करोडो रुपये उचलून बोगस कामे दाखवून रक्कम हडप करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना काही राजकीय पक्षाच्या नेत्यांचा पाठींबा असल्यामुळे ते कुणालाही जुमाणण्यास तयार नाहीत.
वन संरक्षक श्री केशव वाबळे तसेच सहाय्यक उप वनसंरक्षक किनवट आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांनी कामा मध्ये कसूर केल्यामुळे व वन विभाग कार्यालय नांदेड समोर मागील तीन महिन्यापासून सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेतली नसल्यामुळे मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.तसेच दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करावी. त्या संबिंधित सर्वांना सेवेतून बडतर्फ करावे. जिल्ह्यात केलेल्या बोगस कामांची विभागीय समिती मार्फत चॊकशी करून कारवाई करावी व त्यांनी केलेल्या अपहारातील रकमेची भरपाई करावी,त्यांच्या मालमता जप्त कराव्यात, जिल्ह्यातील सर्व वन कामगारांना कामावर घ्यावे. थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे.वझरा शेख फरीद ता. माहूर येथील रोपवाटिका सुरु करावी या मागण्यासह इतरही मागण्या करण्यात येत आहेत.
तीन महिन्यापासून सुरु असलेल्या धरणे आंदोलनाची दखल घेतली नसल्यामुळे एका आदिवासी महिलेचा जीव जाणे ही घटना खुपच गंभीर असून त्या सर्वांवर अट्रॉसिटी कायद्या प्रमाणे कारवाई होणे अवश्यक आहे.असे सीटू चे जनरल सेक्रेटरी तथा वन कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी लेखी कळविले आहे.मुख्यमंत्री आणि वन मंत्र्यांना दिलेल्या
निवेदनावर कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.श्याम सरोदे,कॉ.जयराज गायकवाड, कॉ.गंगाधर खुणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.अशी माहिती कॉ.गंगाधर गायकवाड
अध्यक्ष – वन कामगार संघटना (CITU)यांनी आमच्या प्रतिनिधीना दिली आहे.